परवा असंच कोणीतरी विचारलं कि तुला कोणते खेळ खेळायला आवडतात . त्यावर मला काही क्षण विचार करावा लागला . आणि या किरकोळ विचाराने खरा गहन प्रश्न पडला - मला मुळात विचारच का करावा लागतोय ?? आणि मग हळु हळु ते सगळे खेळ एका मागोमाग एक स्मरणात आले .
लपंडाव, क्रिकेट , सापशिडी, खो-खो, आंधळी - कोशिंबीर, लंगडी , विष-अमृत, चिपरी पाणी , पतंग - हे तर झाले सामान्य खेळ. पण मला आठवले ते आमचे लहानपणीचे काही विषिष्ट खेळ.
मैदानी खेळांमध्ये आम्ही खालील खेळ अगदी नियमित खेळायचो. संध्याकाळी गृहपाठ संपला कि दूध पिऊन जे बाहेर पडायचं ते थेट रात्रीच्या जेवणालाच घरी परतायचं . आमच्यासोबत हे खेळ खेळायला पेठेतून लांब लांबून पोरं यायची .रोज संध्याकाळी वाड्यासमोर मोठी टोळी जमायची. आणि खालील खेळ अगदी बेधुंद होऊन खेळले जायचे .
लगोरचा - या खेळात २ गट केले जायचे . तुटलेल्या फरशीचे तुकडे गोळा करून, त्याचा एक लहानसा मनोरा उभा करून, एक गडी काही अंतरावरून तो मनोरा बॉल मारून फोडायचा. तो फुटता क्षणी विरुध्ध गटातील गड्याने तो बॉल घेऊन फोडणाऱ्या गटातील गड्याला मारायचा . फोडणाऱ्या गटाचा हेतू म्हणजे अंगावर आलेला बॉल हुकवून तुटलेला मनोरा पुन्हा उभा करणे . तो उभा राहताच 'लगोरचा ' अशी आरोळी ठोकून स्वतःच्या गटाचा विजय घोषित करायचा . एक तरबेज होता, त्याला आम्ही "अजित-फोडीत, अजित-फोडीत " असे चिडवायचो. आणि एकाचा नेम इतका वाईट होता कि विशालगडावर लावला तर पन्हाळगडावर लागायचा , त्याला आम्ही "सुधीर-सुधर सुधीर-सुधर " असे चिडवायचो.
गोल्ड स्पॉट - या खेळात सगळ्यांनी हाताची साखळी करून गोलात उभं राहायचं . आणि "गोल्ड स्पॉट" असं म्हणून घोळ्क्यापासून जितक्या लांब उडी मारता येईल तितकी मारायची . तेवढ्यात कोणीतरी "मी राजा " असं म्हणुन खेळ सुरुवात करायचा . राजाचं काम म्हणजे एका ढांगेत शेजारच्याच्या पायावर पाय टाकून त्याला बाद करणे. ज्यावर नेम धरला तो गडी राजाला चुकवून आपले पाउल पुनर्स्थित करू शकायचा . राजाला हुकावणारा मग स्वतः राजा व्हायचा आणि उरलेल्यांमध्ये खेळ पुढे चालायचा .
डब्बा एक्ष्प्रेस्स - हा म्हणजे आमचा सोयीस्कर लपंडाव . व्हायचं काय कि लपंडाव खेळतांना ज्याच्यावर राज्य आहे तो कुठे जाऊन अंक मोजणार हे ठरलेलं असायचं . आमच्या पेठेतल्या रस्त्यावर वाड्यापासून १००मीटर अंतरावर एक बोरिंग होतं . एरवी तिथे जाऊन अंक मोजायचा नियम होता . पण काळाने तो बदलत गेला . आम्ही वापरात नसलेला एक डब्बा घ्यायचो . रस्त्यावर खडूने एक गोल आखायचो . त्या गोलात उभं राहुन जितक्या लांब फेकता येईल तितक्या लांब तो डब्बा फेकायचो . ज्यावर राज्य आहे त्याने पळत जाऊन तो डब्बा आणून पुन्हा गोलात ठेवायचा. तो आणेपर्यंत बाकीचे गडी लपायचे . या लपंडावात धप्पा देणे म्हणजे गोलातला डब्बा लाथ मारून उडवणे .सरड्या (श्रेयस) एकदा असा लपून बसला होता कि आम्हाला दुसऱ्या दिवसाच्या खेळालाच सापडला.
कांदाफोडी - थोडक्यात अडथळ चुकवून उडी मारायची . पण ही अडथळ तयार करायची आपल्या शरीराच्या काही आसनांनी . हा खेळ खेळताना इतक्या मुलांचे इतके दात पडले होते कि सगळे गोळा केले असते तर एक माळ तयार झाली असती .
जोड साखळी - या खेळात ज्याला आपण पकडून बाद करू त्याचा हात हातात घेऊन मग पुढचा गडी पकडायचा . अशी ती आमची साखळी एवढी मोठी व्हायची कि शेवटच्या टोकाच्या मुलाची नुसती फरफट व्हायची . फुलेंचा स्वप्नील एकदा असाच ओढला जाऊन मागच्या मागे गटारीत पडला होता . आणि आम्ही सगळ्यांनी खूप शिव्या खाल्ल्या होत्या .
tipi tipi top top - ज्याच्यावर राज्य आहे तो "tipi tipi top top " असं ओरडायचा . मग सगळे त्यावर "which color do you want ?" असं विचारायचे . मग त्याने लाल म्हणलं कि सगळ्यांनी लाल रंग शोधून शिवायचा . तो रंग शोधून तिकडे पोचेपर्यंत तुम्हाला बाद केले जाऊ शकते . हा खेळ खेळायचा ठरला कि पोरं घरी जाऊन multicolored कपडे घालून यायचे म्हणजे जास्त लांब पळायला नको .एकदा तर निखिल रंगपेटीच खिश्यात घेऊन आला होता .
दही - भात - यात प्रत्येकजण आपापला एक कोपरा धरून उभा असायचा . आणि ज्याच्यावर राज्य आहे तो दही - भात मागत प्रत्येकाच्या दारात फिरायचा . तो दुसऱ्याच्या दारात असताना बाकीचे गडी आपले कोपरे अदलाबदल करु शकतात . दुसऱ्या कोपऱ्यात पोचेपर्यंत वाटेतच पकडला गेला तर बाद . काही जण जागा बदलायला खुणा करायचे आणि आपण गेलो कि ते आपला कोपराच नाही सोडायचे . तेव्हा क्रिकेट मधल्या run -out झाल्यासारखं वाटायचं .
सागर गोट्या - नवल म्हणजे 'गोट्या ' नावाचाच मुलगा या खेळाचा राजा होता . आमच्या बागेत मधोमध एक २०x५० चं लॉन होतं . त्यावरचं गवत जाऊन नुसती माती उरली होती .एका बाजूला आम्ही गल खणली होती . आणि दुसऱ्या बाजूला वेस . वेशीच्या सर्वात जवळ जाऊन ज्याचा कंचा थांबेल तो पहिला खेळणार . आणि मग सुरु व्हायची नापानापी . गोट्या इतक्या लांबून कंचे उडवायचा कि त्याला hunter ची गरजच नव्हती . खेळ संपेपर्यंत सगळ्यांचे रंगीत कंचे गोट्याच्या खिश्यात असायचे .
लोखंड पाणी - या खेळात एक मुक्काम पोस्ट सांगितलं जायचं . आणि तिथे पोचायला वाटेत फक्त लोखंड शिवत जायचं . आम्हाला आजुबाजूचा भंगार , पत्रे , सळ्या यांच्या जागा पाठ झाल्या होत्या . श्रुती एकदा केसांमध्ये लावलेला चाप धरून चालू लागली होती .
रुमाल पाणी - हे म्हणजे "मधलं माकड " या खेळाचा एक प्रकार होता . एका रुमालाची गाठ बांधून राज्य असलेल्या गड्याच्या पायात टाकला जायचा . त्याचं लक्ष नसताना हा रुमाल पळवायचा आणि एकमेकांकडे फेकायचा . आपण पकडले जाऊ असं वाटलं कि तो पुन्हा जमिनीवर टाकायचा .
सगळ्यात शेवटी डाकू डाकू, डॉक्टर डॉक्टर आणि डांबर डांबर - याची गोष्ट अशी म्हणजे डांबर डांबर असा काही खेळच नव्हता मुळात . माझ्या एका भावाने आणि बहिणीने मिळून दुसऱ्या एका बहिणीची असं सांगून फजिती केली होती - ज्याच्यावर राज्य आहे त्याच्या अंगावर एक गोधडी टाकून त्याला मारायचं, डांबरा इतकं काळं होइपर्यंत मारायचं .
दुपारच्या वेळी घरातले लोक झोपले असता किव्वा टोळी मधला एखादा गडी आजारी असता आम्हाला बैठी खेळ खेळायला लागत. कारण न खेळता आमचा एक दिवस सुल्का नाही जायचा . मग अश्या वेळेस आम्ही खालील खेळ खेळायचो.
पट - हा म्हणजे माझ्या आजीने एका कापडावर विणून तयार केलेला लुडो. त्याचे प्यादे म्हणजे लाकडाचे ४ रंगीत ठोकळे . आणि त्याचे फासे म्हणजे ४ संगमरवरी कवड्या. ३ वेळेला सलग १०
पाडले म्हणजे तुमचा प्यादा थेट घरी जायचा . हा खेळ आम्ही भावंडं उन्हाळी सुट्ट्यांमध्ये इतका खेळायचो कि एक दिवस मी स्वप्नात १०, १०,१० असं जोरात बोलत उठले होते .
नाव गाव फळ फूल - या खेळात एकजण A असं जोरात म्हणून उरलेली अक्षरं मनात म्हणायचा . मग त्याला कोणीतरी stop म्हणलं कि ज्या अक्षरापर्यंत तो येउन थांबेल त्या अक्षरावरून सगळ्यांनी नाव , गाव , फळ , फुल इत्यादी लिहायचं . तुमचं उत्तर एकमेव असल्यास १० गुण आणि दुसऱ्या कोणासारख असल्यास ५ गुण . या यादीत आम्ही हळु हळु प्राणी , पक्षी, वस्तु , रंग , भाजी , चित्रपट असं वाट्टेल ते जोडलं होतं . वह्याच्या वह्या भरल्या होत्या .
राजा राणी चोर शिपाई - या खेळात ५ चिठ्ठ्या असायच्या . राजा १००, राणी ५०, प्रधान २०, शिपाई १०, चोर ०. उधळून टाकलेल्या चीठ्ठ्यांमधील एक चिठ्ठी प्रत्येकाने वेचायची आणि शिपाई असलेल्या व्यक्तीने उरलेल्या लोकांमध्ये चोर कोण हे ओळखायचं . कधी कधी लहान मुलांसोबत खेळतांना आम्ही राजा आणि चोर या चिठ्ठ्यांवर ठराविक खुणा करायचो आणि चिडीने जिंकायचो .
आई माझं पत्र हरवलं - हा शक्यतो मुलींचा खेळ असायचा . सगळ्या मुलींनी मांडी घालून मोठ्या गोलात बसायचं .जिच्यावर डाव आहे ती हातात एक रुमाल घेऊन "आई माझं पत्रं हरवलं "असं म्हणत गोलाच्या बाहेरून फिरायची . त्यावर गोलात बसलेल्या सगळ्यांनी "ते मला सापडलं " असं उत्तर द्यायचं. फिरणारी मुलगी इतरांचं लक्ष नसतांना एखादीच्या पाठीमागे हळूच हा रुमाल ठेवून आपल्या जागेवर जाऊन बसायची . रुमाल ठेवताना पकडली गेला कि तिचा पाठलाग करून तिला बाद करण्याचा प्रयत्न केला जायचा .
प्रश्न उत्तर - एका कागदावर मनात येईल तो प्रश्न लिहुन , त्या ओळीची घडी करून , कागद पुढे सरकवायचा . पुढील व्यक्तीने मनात येईल ते उत्तर लिहून , त्या ओळीची घडी करून कागद पुन्हा पुढे सरकवायचा. असे करत करत प्रश्न उत्तर लिहून झाले कि शेवटी तो संपूर्ण कागद उल्घाडायचा आणि असंबंध प्रश्न उत्तरं वाचून पोट धरून हसायचं .
असेच काही तुमचे मजेदार खेळ देखील असतील ना ? आजकाल computer वरच्या खेळांमुळे हे आमचे लहानपणीचे खेळ नास्तीनाभूत झालेत . आणि आता खेळावेत तर जग वेड्यातच काढेल !
No comments:
Post a Comment